पुणे, दि. 15 नोव्हेंबर : ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ या नावाने ओळखले जाणारे श्री. बलवंत मोरेश्र्वर पुरंदरे यांचे पुण्यात आज दि. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरे यांना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली – सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांचे साहित्यिक योगदान खूप मोठे आहे. त्यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. त्यांचे ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘सावित्री’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ ‘महाराजांची राजचिन्हे’, आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.
Add Comment